Mohan Gokhale: दरवाज्यावर ती कविता लिहल्याच्या काही दिवसातच झाला मृत्यू, जणू त्यांच्या लक्षात…

मोहन गोखले हे मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेता होते. त्यांच्या अभिनयाची शैली आणि विनोदाची खासियत त्यांना वेगळे बनवत होती. एक कुशल अभिनेता म्हणून ओळखले जाणारे मोहन गोखले, त्यांच्या अभिनयातील सहजता आणि नैसर्गिकता यामुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर करून राहिले. मात्र १९९९ साली, केवळ ४५ व्या वर्षी, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला, तर त्यांची पत्नी, सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले आणि सहा वर्षांची मुलगी सखी गोखले यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला.

मोहन गोखले यांचे निधन होण्यापूर्वीच्या काही दिवसांत एक विलक्षण घटना घडली होती. १० मार्च १९९९ रोजी, त्यांच्या घराच्या दरवाजावर कुसुमाग्रज यांच्या “डोळ्यात कशाला पाणी” या कवितेतील काही ओळी त्यांनी स्वतः लिहिल्या होत्या. या ओळी होत्या, “शून्यामधील यात्रा, वाऱ्यातील एक विराणी, गगनात विसर्जित होता डोळ्यात कशाला पाणी.” या ओळींनी त्यांच्या मनात असलेल्या विचारांना, त्यांच्या अंतःकरणातील संवेदनांना जणू व्यक्त केलं होतं. या ओळी लिहून काहीच दिवस झाले, आणि २९ मार्च रोजी मद्रास येथे “हे राम” या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

शुभांगी गोखले यांनी ही कविता दरवाजावर कायम स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला, अगदी घराचे रिनोव्हेशन करताना त्यांनी तो दरवाजाचं तुकडा कापून आपल्यासोबत जपून ठेवला. त्यांच्या मुलीने, सखीने देखील या कवितेच्या ओळी टॅटूच्या रूपात आपल्या शरीरावर गोंदवून घेतल्या. ही ओळ सखीच्या जीवनातील तिच्या वडिलांची आठवण म्हणून कायम राहिली आहे.

सखी गोखले आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना सांगते, “बाबांनी घराच्या दारामागे कुसुमाग्रजांच्या ओळी लिहिल्या होत्या, आणि त्यातल्या शेवटच्या ओळी त्यांच्या स्वतःच्या होत्या. घराचं रिनोवेशन झालं तेव्हा आईने तेवढा तुकडा कापून जपून ठेवला. त्यानंतर मी त्या ओळींचाच टॅटू केला.” वयाच्या सहाव्या वर्षीच पित्याच्या निधनाची बातमी समजून घेणे तिच्यासाठी अत्यंत कठीण होते. तिच्या आईने तिला समजावून सांगितले की, काही माणसं देवाची विशेष मुलं असतात, जी आपल्यासाठी एक भेट म्हणून आलेली असतात; देवाला त्यांचा सहवास हवा असतो म्हणून तो त्यांना आपल्याकडे परत बोलावून घेतो. हे शब्द सखीच्या मनात खोलवर कोरले गेले.

मोहन गोखले यांनी त्यांचं आयुष्य कलासृष्टीला अर्पण केलं होतं. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी “आशीर्वाद”, “अल्पविराम”, “जंजिरे” यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. “हे राम” चित्रपटात त्यांनी अभ्यंकर ही भूमिका साकारली होती, ज्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक कमल हसन यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं होतं. नंतर हीच भूमिका अतुल कुलकर्णी यांनी साकारली, ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

मोहन गोखले यांचं निधन जरी अकाली झालं असलं तरी त्यांच्या आठवणी त्यांच्या अभिनयाच्या रूपात आणि कवितेच्या त्या ओळीत कायम आहेत.

Leave a Comment