पुणे : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव मानला जातो. मात्र या उत्सवात दरवर्षी लाखो भक्तांकडून अर्पण झालेले फुलांचे हार, नारळ, पाने, फळे अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते. पारंपरिक पद्धतीने या निर्माल्याचा नाश केला जात असे, पण आता याच निर्माल्यापासून शेतकऱ्यांसाठी मौल्यवान सेंद्रिय खत तयार केले जात आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ पुणे युवा यांनी या उपक्रमाला नवा अर्थ दिला आहे. मागील नऊ वर्षांपासून सुरू असलेला ‘निर्माल्य श्रेडिंग प्रकल्प’ शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे.
डीपी रस्त्यावरील जोशी किचन जवळ उभारलेल्या या प्रकल्पात दररोज सकाळी ९ ते १० दरम्यान दगडूशेठ गणपती मंदिरातून साधारण १ टन निर्माल्य जमा केले जाते. हे निर्माल्य श्रेडिंग मशीनमधून प्रक्रिया करून त्याची पावडर तयार केली जाते. त्यापासून दररोज ३०० ते ४०० किलोपर्यंत सेंद्रिय खत तयार होते.
हे तयार झालेले खत गरजू शेतकरी, सोसायट्या आणि पर्यावरणपूरक शेती करणाऱ्यांना विनामूल्य दिले जाते. प्रकल्पाचे अध्यक्ष अविनाश डोईफोडे, सचिव दिनेश अंकम, प्रकल्प संयोजक मनोज धारप व इतर सदस्य या कामात सक्रिय सहभाग घेत आहेत.
क्लबचे निनाद जोग सांगतात, “गणेशोत्सवात जमा होणाऱ्या निर्माल्याचे खतामध्ये रूपांतर करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो. गेली नऊ वर्षे हा उपक्रम सतत सुरू आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून दररोज मिळणारे सहकार्य महत्त्वाचे ठरते.”
या उपक्रमामुळे फक्त पर्यावरण संवर्धनाचाच नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासही हातभार लागतो. अशा पद्धतीने भक्तीभावाने अर्पण केलेले फुले-हार आता अन्नदाता शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीची बीजे पेरत आहेत.