नाना पाटेकर यांनी व्यक्त केली खंत: “मराठी सिनेमा हिंदीत डब का होत नाही?”

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या विचारशक्ती, शैली, आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांवर अनेक वर्षे भुरळ घातली आहे. वयाच्या ७३ व्या वर्षीही ते सक्रिय आहेत आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या वनवास चित्रपटाच्या निमित्ताने विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत.



एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपटांच्या डबिंग संदर्भात खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “साऊथचे सिनेमे हिंदीत डब होतात आणि लोकप्रिय होतात. मग मराठी सिनेमे हिंदीत का डब होत नाहीत? मराठीमध्ये इतके सकस कंटेंट असूनही त्याकडे दुर्लक्ष का होते? काकस्पर्शसारखा अप्रतिम सिनेमा हिंदीत डब होण्यास पात्र होता. त्यातील कलाकारांचे काम वाखाणण्याजोगे होते. परंतु, आपण या बाबतीत कमी का पडतो आहोत याचा विचार करायला हवा.”

ते पुढे म्हणाले, “फुलवंती हा सिनेमा व्हिज्युअली सुंदर होता आणि पाहताना आनंद देणारा होता. असे सिनेमे मोठ्या प्रमाणात प्रमोट व्हायला हवेत. मराठी सिनेमे केवळ स्थानिक प्रेक्षकांसाठी मर्यादित न राहता व्यापक स्तरावर पोहोचले पाहिजेत. नटसम्राटच्या हक्कांसाठी साऊथची रसिकता दिसते, पण मराठी सिनेमा हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील का नाही?”



मराठी अभिनेत्रींच्या संदर्भातही त्यांनी आपली मतप्रदर्शन केले. ते म्हणाले, “सगळीकडे हिंदी अभिनेत्रींचा प्रभाव दिसतो, पण मराठीतील अमृता, प्राजक्ता, सई यांच्यासारख्या गुणी अभिनेत्री का प्रमोट होत नाहीत? त्यांच्यात अपार क्षमता आहे. त्या हिंदी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवू शकतात.”

नाना पाटेकर यांनी मांडलेली ही खंत मराठी चित्रपटसृष्टीत व्यापक चर्चा घडवून आणण्यास निश्चितच मदत करेल. त्यांच्या मते, मराठी सिनेमांना प्रादेशिक मर्यादांपलीकडे नेण्यासाठी एकसंध प्रयत्नांची गरज आहे.

Leave a Comment